रत्नागिरी : प्रतिनिधी
चिपळूण नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत चिपळूण शहरात होणाऱ्या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या प्रकरणी भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. पत्रकार दीपक दिलीप भागवत यांनी याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
दिनांक २५ मार्च रोजी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अद्यापही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. मात्र अद्याप तपासात फारशी प्रगती दिसत नाही. पोलीस प्रशासन आरोपिंवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले असताना भागवत यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्र पाठवून संबंधित भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हल्ल्यात सहभागी काही व्यक्ती भाजपचे प्राथमिक सदस्य असल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणातील सूत्रधारही पक्षाचे पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भाजप हा शिस्तप्रिय व सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका असल्याचेही भागवत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करून पक्षाची प्रतिमा अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले असून, पक्ष नेतृत्व आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



