रत्नागिरी : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज (१३ फेब्रुवारी) शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. नेहमी निष्ठेचे गोडवे गाणारे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे गद्दार या शब्दाला आता राजकीय वजन आले असून निष्ठावंत शब्द बासनात गुंडाळला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जे आमदार, माजी आमदार आहेत त्यामध्ये एकमेव राजन साळवी असे होते की त्यांनी पडत्या काळातही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. कायम निष्ठावंत म्हणून निष्ठेची टिमकी वाजवून इतर राजकीय नेत्यांना गद्दारीचा शिक्का राजन साळवी मारत होते. मात्र त्याच गद्दार शिक्क्याची अधिकृत मेंबरशीप राजन साळवी यांनी घेतल्याची चर्चा उद्धव ठाकरे गटात आहे.
राजन साळवी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. याची परिणती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाली आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता. या पराभवात राजन साळवी यांच्या तीन पीएनी मिळून त्यांचा घात केल्याचे बोलले जात आहे. मात्र राजन साळवी यांनी विनायक राऊत यांना टार्गेट केले. विनायक राऊत यांच्या निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून राऊत यांना किमान ४० हजार मताधिक्य मिळायला हवे होते. मात्र तिथे कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात राजन साळवी यांनी काम केल्याची चर्चा होती. त्याचा बदला राऊत यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्या विरोधात काम केल्याचे खुद्द राजन साळवी म्हणत आहेत. त्यामुळे राऊत आणि साळवी यांच्या वादात उद्धव ठाकरे शिवसेनेची वाट लावल्याचे सामान्य शिवसैनिक म्हणत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरुन ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरु होती. याचा निवाडा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी साळवी यांना कटू भाषेत सुनावले होते. तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर दरवाजे उघडे आहेत, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले गेले होते. हीच संधी साधून भाजप आणि शिंदे गटाकडून राजन साळवी यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु, ठाकरेंची साथ सोडायची की नाही, याबाबत राजन साळवी द्विधा मनस्थितीत होते. सुरुवातीच्या काळात त्यांचा भाजपकडे ओढा होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी चक्रं फिरवत राजन साळवी यांना आपल्याकडे खेचून घेतले आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. मात्र राजन साळवी यांना सामंत बंधू यांच्या ताकदीपुढे मागे रहावे लागणार आहे, यात शंकाच नाही! आता साळवी आणि सामंत एकत्र काम करतात की साळवी अडगळीत पडतात, हे येणारा काळ ठरविणार आहे. तूर्तास राजन साळवी यांनी निष्ठावंत शब्दाला श्रद्धांजली वाहिली आहे हे मात्र खरे!




