पालघर : प्रतिनिधी
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली राजापूर लांजा प्रांत झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता.मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघरमधून त्यांची बदली राजापूर येथे झाली होती.
वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच ५० हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली आहे.





