रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यातील पावसाचे एकंदर तालरंग पाहता हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला, तर दुसरीकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे.
वादळी वाऱ्याचा देखील इशारा
दरम्यान या काळात महाराष्ट्रात नुसता पाऊसच पडणार नसून, पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागानं दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याची शक्यता आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे, सर्वदूर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये पुढील २४ तास वातावरण ढगाळ राहणार असून, मुंबई व उपनगरांमध्ये पुढील चार ते पाच तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला, तर दुसरीकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.




