कोलकत्ता : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताने बाधित १०० रुग्ण आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्येही उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, डीडी बांगलाच्या वृत्तनिवेदक लोपामुद्रा सिन्हा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्या. उष्माघाताची बातमी वाचत असतानाच त्यांना भोवळ आली.
लोपामुद्रा सिन्हा यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लाईव्ह बातम्या वाचत असताना माझा रक्तदाब (बीपी) कमी झाला होता त्यामुळे मी बेशुद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत फार बरी नाहीये. त्या दिवशीदेखील मला बरं वाटत नव्हतं. मात्र मला वाटलं थोडं पाणी प्यायल्यावर बरं वाटेल. मी कधीच स्टुडिओत पाणी घेऊन जात नाही. १० मिनिटांसाठी मी स्टुडिओत जाऊन बातम्या वाचणार असेन, अथवा अर्थ्या तासासाठी, मी कधीच पाणी घेऊन जात नाही. त्या दिवशी मी स्टुडिओमधील व्यवस्थापकाला इशारा करून पाणी आणून देण्यास सांगितलं. मात्र त्यांनी पाणी आणण्यापूर्वीच मी बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाले. मी त्यावेळी पाणी पिऊ शकले नाही. लोपामुद्रा सिन्हा म्हणाल्या, माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती तेव्हा मी पाहिलं की, चार बातम्या बाकी आहेत. मला वाटलं या चार बातम्या मी पूर्ण करू शकेन. त्यातल्या दोन बातम्या मी कशाबशा वाचल्या. त्यानंतर तिसरी बातमी उष्माघाताशी संबंधित होती. ती बातमी वाचताना मला हळूहळू भोवळ येऊ लागली. त्यावेळी मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मी ही बातमीदेखील पूर्ण करेन असं मला वाटलेलं. तेवढ्यात मला दिसणं बंद झालं. माझ्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार होता. मला टेलिप्रॉम्प्टर दिसतच नव्हता. माझ्यासमोरचं दृष्य हळूहळू पुसट होत गेलं. सुरुवातीला वाटलेलं की, टेलिप्रॉम्प्टरच धिम्या गतीने चालतोय. मात्र मलाच दिसेनासं झालं होतं. तेवढ्यात मी डोळे मिटले.





