‘विकास’ म्हणजे नक्की काय? सिमेंट-काँक्रीटची जंगले, चिमण्यांमधून निघणारा काळा धूर, की निसर्गाचा बळी देऊन उभारलेले महाकाय प्रकल्प? कोकणच्या लाल मातीला, तिथल्या निळ्याशार समुद्राला आणि समृद्ध जैवविविधतेला सध्या याच ‘विकासाच्या’ नावाखाली वेढले जात आहे. पूर्णगड, देवगड, बारसू, जैतापूर… ही केवळ गावे किंवा भूभाग नाहीत, तर ती कोकणाची फुफ्फुसे आहेत. पण आज याच भागात अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी आणि बॉक्साईट मायनिंगसारख्या विनाशकारी प्रकल्पांची टांगती तलवार आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक जनतेचा आणि पर्यावरणवाद्यांचा एकच ठाम आवाज उठत आहे: “असा रोजगारच नको, जो आपल्या भविष्यातील पिढीलाच उध्वस्त करेल!

रोजगाराच्या नावाखाली फसवणूक?
प्रकल्प आणताना नेहमी एकच गाजर दाखवले जाते – ‘स्थानिकांना लाखो रोजगार मिळतील आणि भागाचा कायापालट होईल.’ पण जैतापूर, बारसु, देवगड, पूर्णगडचा अणुऊर्जा प्रकल्प असो, बारसू, नाणारची रिफायनरी असो की राजापूर तालुक्यातील बॉक्साईट मायनिंग, या प्रकल्पांचे दुष्परिणाम रोजगारापेक्षा कैक पटीने भयानक आहेत.
अणुऊर्जेची टांगती तलवार : अणुऊर्जेतून निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा (Radioactive Waste) हजारो वर्षे नष्ट होत नाही. निसर्गात किंवा समुद्रात झालेली छोटीशी गळतीही संपूर्ण पिढी अपंग किंवा कॅन्सरग्रस्त करू शकते. चेर्नोबिल आणि फुकुशिमाच्या दुर्घटनेतून आपण काहीच शिकणार नाही का?
रिफायनरीचे प्रदूषण : पेट्रोकेमिकल रिफायनरीमधून निघणारे विषारी वायू आणि समुद्रात सोडले जाणारे रासायनिक पाणी यामुळे कोकणची हवा आणि पाणी दोन्ही विषारी बनतील. आंबा, काजू आणि मासेमारी हा कोकणचा खरा कणा आहे, रिफायनरीमुळे हा नैसर्गिक रोजगार कायमचा नष्ट होईल.
बॉक्साईट मायनिंगमुळे उजाड होणारे डोंगर : बॉक्साईटच्या उत्खननामुळे हिरवेगार डोंगर उघडे-बोडके होत आहेत. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असून, भविष्यात कोकणावर पाण्याचे भीषण संकट ओढवण्याची भीती आहे.
‘शाश्वत’ विरुद्ध ‘विनाशकारी’ विकास
“आम्हाला असा रोजगार नकोय जो आज दोन घास देईल, पण उद्या आमच्या मुलांच्या हातात ऑक्सिजनचे सिलिंडर आणि पाण्याचे रिकामे हंडे देईल.” कोकण आधीच स्वावलंबी आहे. कोकणाकडे निसर्गाने दिलेले असे वरदान आहे, ज्याच्या जोरावर लाखो लोकांना पर्यावरणपूरक रोजगार मिळतो आणि पुढेही मिळत राहील. आंबा काजू उत्पादनावर परिणाम होईल. मासेमारीवरही तितकाच परिणाम होईल. असा निसर्गाचा ऱ्हास झाल्यावर पर्यटक कोकणाकडे फिरकणारही नाहीत. आज जर आपण रोजगाराच्या तात्पुरत्या आमिषाला बळी पडलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. ज्या मातीने आपल्याला जगवले, त्या मातीचे वाळवंट होऊ देणे हे कुठल्याही सुजाण नागरिकाला पटणारे नाही. विकास असा हवा जो निसर्गाशी नाते सांगणारा असेल, निसर्गाचा गळा घोटणारा नाही.म्हणूनच, आमचा ठाम नकार आहे. नाही पाहिजेत आम्हाला ती घातक अणुऊर्जा केंद्रे, नाही पाहिजेत त्या विष ओकणाऱ्या रिफायनरी आणि नाही पाहिजेत ते डोंगर पोखरणारे बॉक्साईट मायनिंग! आम्हाला हवा आहे शाश्वत विकास, हिरवेगार कोकण आणि सुरक्षित भविष्य!




