महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचे जीवन आणि हालचाल अवलंबून असलेली एसटी सेवा आज स्वतःच गंभीर संकटात सापडली आहे. एकेकाळी ग्रामीण भागाचा श्वास ठरलेली ही लालपरी आज प्रवाशांसाठी त्रासदायक आणि कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत चालली आहे. खराब रस्ते, ओव्हरलोड काम यामुळे चालक वाहक मेटाकुटीस आले आहेत. प्रवाशांना धक्के खात, धूर ओकणाऱ्या भंगार गाड्यांमध्ये जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय, तर दुसरीकडे या गाड्या चालवणारे चालक आणि वाहक दिवसरात्र आरोग्याच्या, मन:स्वास्थ्याच्या आणि कायद्याच्या झंजावातात सापडले आहेत.
राज्यातील अनेक एसटी आगारांमध्ये आजही १० ते १५ वर्षांहूनही जुन्या गाड्या धावत आहेत. या बसेसचे ब्रेक वेळेवर लागत नाहीत, सस्पेन्शन खिळखिळं आहे, अनेकांच्या सीट तुटलेल्या आहेत आणि दरवाजे अडकतात. काही गाड्यांमध्ये हेडलाईट्स नसल्यानं रात्री प्रवास म्हणजे अंधारातल्या अपघाताचं आमंत्रण ठरतं. प्रवासी तक्रार करतात, पण ऐकणारा कोणी नाही. चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड भागांमध्ये या भंगार बसेसचा प्रसार अधिक असून दररोज प्रवासी धडधडत्या छातीने गंतव्य गाठतात.
या धोकादायक गाड्यांमागे जे उभं आहेत ते म्हणजे एसटीचेच चालक आणि वाहक. मात्र त्यांची अवस्था सुद्धा काही वेगळी नाही. दररोज १० ते १२ तासांच्या ताणतणावाखाली, रात्रपाळ्या आणि अपुऱ्या झोपेमुळे हजारो चालक-वाहक आज मणक्याच्या दुखण्यांनी, मूळव्याध, मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश आणि नैराश्य यांसारख्या व्याधींनी ग्रासले आहेत. त्यातच जबाबदारीने काम करत असतानाही, तांत्रिक बिघाडांमुळे घडणाऱ्या किरकोळ अपघातांवरही केसेस दाखल होत असून अनेक निष्पाप कर्मचारी कारवाईच्या झपाट्यात येत आहेत.
गेल्या काही महिन्यांत हजारांवर चालक-वाहकांवर विनाकारण चौकशा आणि निलंबनाची कारवाई झाली आहे. गाड्या निकृष्ट असूनही त्यांना जबाबदार धरलं जातं. अनेकवेळा, ज्या चुका यंत्रणेच्या आहेत त्याचे खापर चालकांवर फोडले जाते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे काम करतानाच सतत एक मानसिक दडपण – ‘कधी तरी काही तरी चुकेल आणि नोकरीवर गदा येईल’ – अशी भीती त्यांना कुरतडते आहे.
दुसरीकडे, एसटी महामंडळाकडे ना नवीन बसेस खरेदीसाठी निधी आहे, ना जुनी वाहने बदलण्यासाठी ठोस कृती. शिवशाही सारखी काही आधुनिक सेवा आधीच बंद पडली असून उरलेल्याही गाड्यांची देखभाल होत नाही. डिपोंमध्ये यांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, फिटनेस प्रमाणपत्रे केवळ कागदावर दिली जातात. परिणामी, जी गाडी सकाळी प्रवासासाठी निघते, ती प्रत्यक्षात कधीही थांबू शकते – प्रवासी अडकतात, चालक फसतो.
ही समस्या केवळ व्यवस्थेची नव्हे, तर ती लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेची, हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि जनसामान्यांच्या जीवनगतीची आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास, लालपरीची ही स्थिती आणखी गंभीर होईल. सरकार आणि महामंडळाने एकत्र येऊन आरोग्य विमा, नियमित तपासणी, आधुनिक ताफा आणि चालक-वाहकांसाठी विश्रांती योजना राबवणे अत्यावश्यक आहे. कारण प्रश्न केवळ प्रवासाचा नाही, तर जीवनाचा आहे.





