रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील जागृत मोटर्समधून बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकल्याच्या आणि थकीत वेतन व नुकसान भरपाई न दिल्याचा आरोप करत चार पीडित कर्मचाऱ्यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत काम करत असताना त्यांना किमान वेतनही दिले जात नव्हते. याबाबत मालक श्री. राजेंद्र जोशी यांच्याशी वारंवार बैठका घेऊनही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी वकिलामार्फत राजीनामा दिला होता; मात्र तो न स्वीकारता कंपनीने खोट्या कारणांवरून अंतर्गत चौकशी लावून तडकाफडकी कामावरून काढून टाकले. तसेच उपदान (ग्रॅच्युइटी) व इतर कायदेशीर लाभांपासून वंचित ठेवल्याचा आणि कामगार आयुक्तांकडे कंपनीविरोधात तक्रारी प्रलंबित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी राजेंद्र मनोहर साळवी, अरबाज इक्बाल झारी, सुदर्शन कृष्णा तावडे आणि उत्कर्षा उपेंद्र नाटेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असून, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाणे (रत्नागिरी) यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.




